संवेदने सुरु केलेला खो-खो चा उपक्रम आवडला व त्यात सहभागी होण्याची इच्छा त्याच्या ब्लॉगवर व्यक्त केल्यावर विरोपाद्वारे त्याने मला खो दिला. तो स्वीकारून मला आवडलेल्या कविता इथे देत आहे, त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)
संवेदने "एक से मेरा क्या होगा" सिंड्रोमबद्दल सांगितलं. मला तर "दो से मेरा क्या होगा" सिंड्रोमही आहे. पण तरी त्याला आवरतो आणि मला आवडणार्या दोन कविता इथे देतो.
पहिली कविता - "वीज म्हणाली धरतीला" या नाटकातली आहे. कवी -कुसुमाग्रजचार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यांत हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली
तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली
बाण आला एक कोठुन, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा
कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले यात सारे पावले
(ता.क. संपूर्ण कविता "
आठवणीतली गाणी" या संकेतस्थळावर अत्ताच सापडली. त्यानुसार वरील कवितेत बदल केले आहेत.
-प्रशांत, २१ जून २००९)
दुसरी कविता -कोठेही जा!कवी - सुरेश भटकोठेही जा दूरदूर तू माझ्यापासुन ...
माझे गीत तुला तेथेही काढिल शोधुन!
न्हाउन जेव्हा केस मोकळे देशिल सोडुन
दरवळेल हा मंदमंदसा सुगंध होउन
सहज अहेतुक तू एकांती करशिल गुणगुण ...
तुझिया नकळत स्वरात मिसळत जाइल हे पण-
वा गाण्याचा होता आग्रह सखीजनांतुन
अनाहुतासम तुझिया ओठी बसेल जाउन
आणि शेवटी असाच तुजला येता अनुभव,
तुजला माझ्या ह्या असण्याचा होइल आठव
आणि आता वेळ आली खो देण्याची -माझा खो
नीरजा व
आदित्य यांना.