मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, December 20, 2008

नजर (२)

ओतप्रोत ओसंडतो
जगीचा झगमगाट;
त्यावर भाळे नजर
धरे ऐहिकाची वाट.

प्रतिष्ठित असे कुणी,
तैसे कुणी उपेक्षित;
होमकुंडी हव्यासाच्या
ज्वाला अखंड तेवत.

जुगार खेळी नजर
वासना विखारलेली;
शील लीलावात गेले
अपमानित पांचाली.

वासनेच्या त्या विखारी
आशाळभूत नजरा;
येई भोवळ जीवाला
पाहुनी त्यांचा पसारा.

एक हक्काचा आसरा
शोधीतसे ती नजर;
परी हिरमोड होई
चाले सर्वत्र बाजार.

जाई थकुन नजर
नजरांच्या नजरांनी;
"आयुष्याची ही लक्तरे"
म्हणे, "सांभाळे का कोणी?" (२)

नजर (१)

ती लाडिक नजर तुझी टिपली मम अक्षे
उघडली तदा जणु आयुष्याची गवाक्षे
फुलवून पिसारा मनमोराचा तेव्हा
हर्षात नाचलो, तुला पाहिले जेव्हा

डोळ्यांत सतत तू, झोप न ये मग रात्री
रोमांच येती तव आठवणींनी गात्री
वाटे, भेटावे तुला, आणि सांगावे
जे विचार माझे, तुजला सर्व कळावे

पण कशी करू सुरुवात? कळे ना काही
तू समोर येता, विचारभान न राही
सांगण्या मनीचा विचार तुजला राणी
तुज पत्र लिहाया धरिली मी लेखणी

प्रतिसाद तुझाही आहे होकारार्थी,
तव नजर बोलते अन्‌ मजला ही खात्री
मग कशास आता आंधळी कोशिंबीर?
सांजवेळी भेटू गाठुन सागरतीर

Sunday, November 30, 2008

हायकू

आली भरती
समुद्रास परंतु
सांज जाहली

Monday, October 27, 2008

धार्मिक कृत्ये व पंचाग - भाग १: लक्ष्मीपूजन

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नरकचतूर्दशी, लक्ष्मीपूजन इ. केव्हा आहे, हे पाहण्यासाठी दाते पंचाग उघडलं, व काही महत्त्वाच्या बाबी चटकन डोक्यात आल्यात. विषय मोठा असल्यामुळे एकाच पोस्टात सांगणं अवघड आहे. त्यामुळे "धार्मिक कृत्ये व पंचांग" हे नवीन सदर सुरू करतोय. त्याचे सर्व भाग लागोपाठच देईन असं नाही. वेगवेगळ्या सणांच्या वेळी (आवश्यक तेव्हा) या सदरात माहिती देत राहीन. आता दिवाळी सुरू असल्यामुळे पहिल्या भागात यंदाच्या लक्ष्मीपूजनाबद्दल माहिती देत आहे.

तिथी, वार, योग, करण व नक्षत्र या कालमापनाच्या पाच अंगांपासून हिंदू पंचाग बनलं आहे. हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा असं काळाचं चक्र ज्याप्रमाणे विशिष्ट गतीने चालू असतं, त्याप्रमाणे पंचांगातील या पाच अंगांची आवर्तनेही कालमर्यादेत बांधली आहेत. या समन्वयाचा उपयोग ऋतुमानानुसार जे सण साजरे करतात त्यांचा काळ/मुहूर्त ठरवण्यासाठी केला जातो. हिंदूंच्या बहुतांश सणांशी धार्मिक कृत्ये निगडित असतात. आकाशस्थ ग्रह-तार्‍यांना हिंदू धर्मात देवता मानल्यामुळे विशिष्ट धार्मिक कृत्याचे वेळी आकाशात विशिष्ट स्थितीत ग्रह-तारे असावेत असा धर्मशास्त्राचा विचार आहे. यामध्ये काही प्रमाणात वैज्ञानिक कारणे आहेत, तर काही बाबतीत सामाजिक सोयींचा विचार आहे. व्रतवैकल्यांमध्ये काळानुरूप बदल करायचे असल्यास त्यातील वैज्ञानिक बाबी कोणत्या व सामाजिक सोयींशी निगडित बाबी कोणत्या, हे समजून घ्यायला हवं.

परदेशस्थ भारतीयांमध्ये सुटीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून सणानजीकच्या वीकांतात तो सण साजरा होतो व ते योग्यच आहे. परंतु, त्या त्या सणांशी निगडित असलेली धार्मिक कृत्ये घरातल्या घरात करायची असल्यामुळे ती वेळाच्या वेळीच करावी अशी अनेकांची इच्छा असते, आग्रह असतो व त्यानुसार सर्व विधी यथासांग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतं. भारतामध्ये राहणार्‍या लोकांना भारतातलं पंचाग सहज उपलब्ध असल्यामुळे व्रतवैकल्यांसाठी योग्य दिवस, वेळ निवडणं अत्यंत सोपं आहे. परंतु, इथे अमेरिकेत व्रतवैकल्ये साजरी करताना पंचाग सहजपणे उपलब्ध होत नाही. पंचाग उपलब्ध झालं, तरी त्यातल्या महत्त्वाच्या बाबी माहित नसल्यामुळे "चार-लोकं करतात तसे करावे" किंवा भारतापेक्षा साधारणपणे अर्धा दिवस मागे असल्यामुळे भारतात ज्या तारखेला सण साजरा होतो, ती तारीख अमेरिकेत उजाडल्यावर अमेरिकेत साजरा करायचा, असं अनेकांचं मत आहे. परंतु, ते प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. किंबहुना, "तिथी" या अंगावर अवलंबून असलेले बरेच विधी करताना दिवस चुकू शकतो. धार्मिक कृत्यांपैकी "तिथी"शी जी कृत्ये अवलंबून आहेत, त्यांत काहींसाठी सूर्योदयाचे वेळी, काहींसाठी सूर्यास्ताचे वेळी ती तिथी असणं आवश्यक असतं, तर काही व्रतवैकल्यांमध्ये दिवसभरात ती तिथी किती वेळ असते याच्याशी संबंध असतो.

सध्या दिवाळी सुरू असल्यामुळे त्यातलंच उदाहरण देतो. अश्विन कृष्ण द्वादशी (गोवत्सद्वादशी - वसुबारस) पासून कार्तिक शुक्ल द्वितीया (यमद्वितीया - भाऊबीज) या दिवसांमध्ये घरात पहाटे व सायंकाळनंतर पणत्या प्रज्वलित करायचा तो हा सण : दिवा + आळी = दिवाळी. यात अश्विन अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार सूर्योदयापासून सूर्यास्तानंतर १ घटिकेपेक्षा जास्त (१ घटिका = सुमारे २४ मिनिटे) अमावस्या असल्यास त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. दोन दिवस अमावस्या असेल, तर दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर साडेतीन प्रहरांपेक्षा जास्त (साडेदहा तासांहून जास्त) वेळ अमावस्या असल्यास दुसर्‍या दिवशी, अन्यथा पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.

आता यंदाचं पंचांग पाहू (शालिवाहन शक १९३०). यंदाच्या दाते पंचागात सांगितल्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. २८ ऑक्टोबर २००८ रोजी पहाटे ३:३३ वाजता अमावस्या सुरू होऊन दि. २९ ऑक्टोबर २००८ ला पहाटे ४:४४ वाजेपर्यंत अमावस्या तिथी राहणार आहे. याचा अर्थ, भारतामध्ये २८ तारखेला दिवसभर अमावस्याच असणार व पुढील वार सुरू होईल तेव्हा (दुसर्‍या दिवशी सूर्योदय होईल तेव्हा) प्रतिपदा सुरू झालेली असेल. त्यामुळे (दाते पंचांगात सांगितल्यानुसार) भारतात मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत आहे.

आता अमेरिकेमध्ये अमावस्या केव्हा आहे ते पाहू. कॅलेंडरवरील तारीख सूर्योदयास्तावर अवलंबून असली, तरी तिथीचं तसं नसतं. कालनिर्णय डॉट कॉम या वेबसाईटवर न्यू यॉर्क, शिकागो व सॅन फ़्रॅन्सिस्को या तीन शहरांसाठी पंचांग दिलं आहे. ढोबळमानाने नजीकच्या शहरांमध्ये त्यांचा आधार घेता येऊ शकतो.
न्यूयॉर्कमध्ये सोमवार दि. २७ रोजी अमावस्या सुरू होत असून दि. २८ रोजी सूर्यास्तानंतरपर्यंत अमावस्या आहे (साडेतीन प्रहराहून अधिक काळ). शिकागोमध्ये दि. २७ रोजी अमावस्या सुरू होते आहे व सूर्योदयापासून साडेतीन प्रहराहून थोड्या जास्त वेळासाठी अमावस्या आहे. सॅनफ़्रॅन्सिस्कोमध्ये २७ तारखेला अमावस्या सुरू होत आहे व दि. २८ ला साडेतीन प्रहरांपेक्षा जवळ जवळ दोन तास कमी वेळ अमावस्या आहे. याचा अर्थ, सॅनफ़्रॅन्सिस्कोपेक्षा साधारणपणे दोन तास आगोदर सूर्योदय होतो त्या शहरांमध्ये व त्यांच्या पूर्वेकडे मंगळवार दि. २८ रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत असून पश्चिम अमेरिकेत मात्र सोमवारी म्हणजे दि. २७ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं उचित ठरेल. अलास्का व हवाई बेटांवरसुद्धा २७ तारखेलाच लक्ष्मीपूजन करणं योग्य ठरेल.


भाग १ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

Saturday, October 18, 2008

पहाट-प्रभात

पहाट झाली
नभ झाले केशरी
उजळे प्राची

पक्षी जमले
किलबिल करण्या
झाडांवरती

अंगणातला
मोगरा बहरला
सडा सांडला

गंध फुलांचा
हळूच पसरुन
वाहे समीर

पानांवरती
चमचम करती
माणिक मोती?

रविकिरणे
अंगावर सांडली
दवबिंदूंच्या

हा हा म्हणता
तम विरले आणि
लख्ख जाहले

प्राचीवरती
अरुणोदय झाला
प्रभात झाली


सुमेधाने सुरू केलेला साखळी हाईकूचा खेळ, सईने हाईकुबद्दल दिलेली माहिती आणि त्यानंतर सुमेधाने केलेली चांद लबाड ही हाईकु-कविता, या सगळ्यांतून प्रेरणा घेऊन मीसुद्धा हाईकु करण्याचा प्रयत्न केला. नंतर सईशी गुगल-गप्पांमध्ये चर्चा झाल्यावर हाइकु म्हणजे केवळ तीन ओळींची कविता (कडवं नव्हे!) हे कळलं. असो. तर हाइकुमधलं ५-७-५ असं अक्षरांचं बंधन जरी या कवितेत असलं, तरी या कवितेत अनेक कडवी असल्यामुळे याला हाइकु म्हणणं योग्य ठरणार नाही. "हाइकु"च्या वृत्ताची (किंवा वृत्तीची?) कविता असं या रचनेकडे पाहता येईल का?

Sunday, September 28, 2008

लतादीदींना

अंगाई वा प्रेमगीत वा असो ईश्वराचे ध्यान
विरह असो वा गाण्यात असो देशभक्ती महान
अंखंड राहो बरसत तुमच्या गळ्यामधुनिया तान
तृप्त करित राहो संतत ते रसिकश्रोत्यांचे कान
ध्रुवतार्‍यासम अचल "लता" हे संगीतातिल स्थान
शब्दांमध्ये अशक्य कथणे कीर्तीचे महिमान
सदा मिळो नवपिढीस तुमच्या गाण्यातुन प्रेरणा
"जुग जुग जिये लतादीदी" ही ईशचरणी प्रार्थना



आज २८ सप्टेंबर. ज्यांच्या गाण्याने "सुबह चले, शाम ढले" अशी लाखो रसिकांची दैनंदिनी आहे, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका, भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. लतादीदींबद्दल लिहिण्याइतकी माझी योग्यता नाही. त्यांच्या प्रतिभेला साजेसे तोलामोलाचे शब्द सुचत नसले, तरी पण एक रसिक म्हणून मला जे काही सुचलं, ते आदरणीय दीदींना प्रेमपूर्वक अर्पण करतो. त्यांना आयुरारोग्य लाभो व त्यांचा संगीतप्रवास असाच अखंडपणे चालत राहो व रसिकांना मोहिनी घालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Saturday, September 27, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदने सुरु केलेला खो-खो चा उपक्रम आवडला व त्यात सहभागी होण्याची इच्छा त्याच्या ब्लॉगवर व्यक्त केल्यावर विरोपाद्वारे त्याने मला खो दिला. तो स्वीकारून मला आवडलेल्या कविता इथे देत आहे, त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्‍यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

संवेदने "एक से मेरा क्या होगा" सिंड्रोमबद्दल सांगितलं. मला तर "दो से मेरा क्या होगा" सिंड्रोमही आहे. पण तरी त्याला आवरतो आणि मला आवडणार्‍या दोन कविता इथे देतो.

पहिली कविता -

"वीज म्हणाली धरतीला" या नाटकातली आहे.
कवी -कुसुमाग्रज

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यांत हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली

बाण आला एक कोठुन, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले यात सारे पावले


(ता.क. संपूर्ण कविता "आठवणीतली गाणी" या संकेतस्थळावर अत्ताच सापडली. त्यानुसार वरील कवितेत बदल केले आहेत.
-प्रशांत, २१ जून २००९)

दुसरी कविता -

कोठेही जा!
कवी - सुरेश भट

कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासुन ...
माझे गीत तुला तेथेही काढिल शोधुन!

न्हाउन जेव्हा केस मोकळे देशिल सोडुन
दरवळेल हा मंदमंदसा सुगंध होउन

सहज अहेतुक तू एकांती करशिल गुणगुण ...
तुझिया नकळत स्वरात मिसळत जाइल हे पण-

वा गाण्याचा होता आग्रह सखीजनांतुन
अनाहुतासम तुझिया ओठी बसेल जाउन

आणि शेवटी असाच तुजला येता अनुभव,
तुजला माझ्या ह्या असण्याचा होइल आठव


आणि आता वेळ आली खो देण्याची -
माझा खो नीरजाआदित्य यांना.

Saturday, September 20, 2008

पाऊलवाट

सरला पाऊस तरी ओली पाऊलवाट
साठले धुके मनी आठवणींचे दाट

आठवे मोगरा स्वप्नांत बहरलेला
आठवती तरंग उठलेले पाण्यात

घर उभारले वाळूचे नयनमनोहर
घटकेत मोडले येता सागरलाट

दवबिंदू टिपण्या बागेमध्ये गेलो
पण सांज जाहली येण्याआधी पहाट

जाणीव तुझ्या नसण्याची होई नित्य
तळपे भास्कर परी अंधारले घरात

Friday, September 12, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला चक्रपाणिकडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:

रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)


जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)


आणि आता हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी


आणि माझा खॊ आशाताई, आनंदसौरभ यांना

Wednesday, September 10, 2008

पंखांतलं आभाळ

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
सप्तरंगी रंगले किरणांत जे नित भास्कराच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
चांदण्याने बहरले जे रात्रसमयी पौर्णिमेच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
वर्षवी मेघांमधुन जे अमृताते चातकाच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
छ्त्र जे सर्वां तयांचे, आप्त ना विश्वामध्ये ज्यां

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
विरळ परी विस्तीर्णही जे, थांग नच लागे जयाचा

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
सांगते मज, "हे न क्षितिज, न बिंदु तुझिया थांबण्याचा"


"एक मी आभाळ आहे ठेविले पंखात माझ्या" ही ओळ एके ठिकाणी वाचली व त्यावरून कविता सुचली. इंटरनेटवर शोधल्यावर कळलं की ही ओळ चंद्रशेखर सानेकर यांच्या "स्पंदने या माणसांची" या ग़ज़लेतल्या एका शेरात आहे. असो. कविता रचली तेव्हा सानेकरांची ग़ज़ल वाचलेली नव्हती तसंच माझ्या कवितेचा आशयही त्या ग़ज़लेहून भिन्न आहे. तरीसुद्धा अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या ग़ज़लेमुळेच ही कविता करण्यास मला प्रेरणा मिळाली आहे, त्यामुळे इथे ते नमूद करणं आवश्यक वाटतं.

Monday, September 8, 2008

प्रसूतिवेदना... थीसिसच्या

पी.एच्.डी. करताना "थीसिस-लेखन" या महत्त्वाच्या टप्प्यात आलेली व्यक्ती लॅबमध्ये "हाय प्रायर्टी पर्सन" झालेली असते. "थीसिस एकं थीसिस" असं आयुष्य बनलं असताना अशा परिस्थितीत चिडचिड, वैताग, काळजी, अधीरता, इत्यादि भावना उफाळून येत असतात. माझा एक मित्र मध्यंतरी या परिस्थितीतून गेला होता व सध्या ऑर्कुटवरील एक मित्र मास्टर्सच्या प्रोजेक्टचा थीसिस लिहिताना त्याच परिस्थितीतून जातोय. या दोघांशीही गप्पा झाल्या तेव्हा त्यांना "चिंता करू नकोस. इट्स जस्ट अ स्मॉल फ़ेज इन लाईफ़" वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझं थीसिस-लेखन, त्यावेळची माझी झालेली चिडचिड आणि त्याआधीचं माझ्या सीनियर्सचं थीसिस-लेखन आणि त्यांची झालेली चिडचिड, इत्यादि सर्व गोष्टी आठवल्यात आणि हसू आलं. थीसिस-लिहिणार्‍या व्यक्तीची ही परिस्थिती आणि थीसिस सबमिट केलेल्या व्यक्तीच्या जीवनातली "झाले मोकळे आकाश" ही परिस्थिती या सर्वांचं अवलोकन करता थीसिस सबमिशनला "थीसिसची प्रसूति" म्हणायला हरकत नाही असं वाटलं. तर, या थीसिसच्या "प्रसूतिवेदना" सोसणारी व्यक्ती स्वतःशीच स्वतःच्या भावना व्यक्त करतेय अशी कल्पना करून कविता करण्याची इच्छा अनावर झाली. अचानक, कविवर्य मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली व त्यावर विडंबन केलं - अर्थातच पाडगांवकरांची क्षमा मागून.



दिवस माझे हे बोचायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

कामांना उरकत जाणे
त्यावरी थीसिस लिहिणे
लायब्ररीत रेफ़रन्स चाळायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

गाठावी लॅबेची खोली
करावी इच्छांची होळी
चार तास फक्त झोपायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

थरारे मस्तक फार
सोसेना कामांचा भार
बरेच "पापड बेलायचे"
प्रसूतिवेदना सोसायचे

अशा या नाजुक परिस्थितीत काही लोकांचे नाजुक संबंध जुळल्याची उदाहरणंही माझ्या माहितीत आहेत. खालील कडवं त्यांच्यासाठी-

माझ्या या लॅबेच्यापाशी
थांब तू गडे जराशी
तुझ्याच आशेने जगायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

Tuesday, August 26, 2008

निसर्गाच्या कुशीतली एक रात्र

उत्तुंग पर्वत विशाल, सुंदर; चौफेर त्याचा पसारा
त्यावरी शोभतो मंडप नभाचा अथांग, नितळ, न्यारा

खडकांच्या आडवळणांमधुनी वाहे जीवनाचा झरा
झुडुपे काटेरी, त्यांवर सुंगंधी रंगीबेरंगी फुलोरा

रात्रीचा समय नीरव शांतता, अंगाला येई शहारा
नाचती डोलती तरुवर, लता; सुसाट वाहतो वारा

चवथीचा चंद्र त्याभोवती आभा, चमकतो शुक्रतारा
चांदण्यांच्या जणु सागराला आली भरती क्षितीजतीरां

अढळपदाला उत्तरदिशेला अचल तो ध्रुवतारा
भोवती तयाच्या फिरतो अखंड नक्षत्रांचा पट सारा

पहाट होतसे गगनाचा भरे संधिप्रकाशे गाभारा
वृक्ष घनदाट झेपावती उंच वंदावया दिनकरां

Wednesday, July 23, 2008

त्रिवेणी

वाटेवरचे काटे असह्य झाले, मग शोधल्या अनेक पाऊलवाटा
नव्या वाटांवर चालताना आठवला चुकून निसटलेला काटा
...
दूर जाण्याचाच अवकाश, डोंगर साजरे वाटू लागतात. नाही?

नवीन घरात जाताना व्यवस्थित सगळं सामान बांधलं
महत्त्वाचं काही राहिलं तर नाही? पुनःपुन्हा उघुडून पाहिलं
...
जुन्याशी जुळलेले ऋणानुबंध नेता येतील का बांधून?

पाहिल्या क्षणापासून तुला मिळवण्याचा ध्यास घेतला
आणि पाहता पाहता इच्छा पूर्ण होण्याचा दिवस उजाडला
...
तू मिळाल्याचा आनंद लुटायला पाऊल का अडखळतंय आज?


कवीश्रेष्ठ गुलज़ार यांच्या "त्रिवेणी" हा काव्यप्रकार मराठीत साधायचा माझ्यापरीने मी प्रयत्न केलाय, अर्थात, गुलज़ार यांची क्षमा मागून. सुमेधाने "शब्दबंध"च्या वेळी या काव्यप्रकाराबद्दल फार सुरेख वर्णन केलं होतं तेव्हापासून हा प्रयत्न करण्याची खूप इच्छा होती. सुमेधाचे मनापासून आभार.

Friday, July 4, 2008

वर्गात एक होती

ऑर्कुटवर मित्रांशी गप्पा मारताना एकदा विडंबनाचा विषय निघाला तेव्हा गदिमांच्या "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" या कवितेवर उत्स्फूर्तपणे विडंबन सुचलं. गदिमांची क्षमा मागून ते विडंबन इथे देत आहे.

वर्गामध्येच होती मुलगी सुरेख एक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

कोणी तिच्याच स्वप्नी दिनरात नित्य रंगे
स्पर्धा कधी ती होता मित्रांत होती दंगे
"व्हावी ती फक्त माझी", सर्वांचं ध्येय एक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

कोणी न व्यक्त करती प्रणयास तिच्यापाशी
सरसावता वदाया संकोचती मनाशी
दिन आणि मास सरले आले जसे कितीक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

एके दिनी परंतू तिजलाच ते म्हणाले
तुजवरी प्रेम अमुचे तुज ना कसे कळाले?
ती बोलली तयांना थांबूनिया क्षणैक
मज न्यावयास आला "तो" राजहंस एक

Sunday, June 29, 2008

रिऍलिटी शो

"कडवट टीकेमुळे स्पर्धक मुलीला नैराश्याचा झटका" ही बातमी ई-सकाळमध्ये वाचली. वाढती लोकसंख्या, वाढती स्पर्धा, वाढत्या महत्त्वाकांक्षा, वाढत्या अपेक्षा..... वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा....

अकराव्या इयत्तेत शिकणार्‍या सिंजिनी दासगुप्ता हिची "राजा मेरी नाच धूम मचा दे" या रिऍलिटी शो मधली कामगिरी न आवडल्याने परीक्षिकेनं दिलेल्या प्रतिक्रियेचा हा परिणाम आहे असं बातमीतून दिसतं. नेमका प्रसंग काय घडला व नेमकं कोण काय बोललं, यापेक्षा, अशा "रिऍलिटी शो"ला आलेलं अवाजवी महत्त्व ही बाब कितीतरी पटीने गंभीर आहे. अशा स्पर्धांमधील विविध पैलूंकडे आता थोडं लक्ष्य देऊ.

"अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांत मुलांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, तरी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे." असं सिंजिनीच्या वडिलांचं म्हणणं वरील बातमीत वाचलं. प्रोत्साहन महत्त्वाचं आहेच व परीक्षकांनी सौम्य शब्द वापरावेत हेही मान्य. पण तसं करून तरी हा प्रश्न सुटणार आहे का? साधारणतः वर्षभरापूर्वी झी-टीव्हीवरील "सारेगमप"मध्ये एका व्यक्तीला नैराश्य आलं होतं. त्याही पूर्वी एकदा एका स्पर्धेच्या वेळी "आपली मुलगी जिंकते की नाही" या चिंतेने एका स्पर्धिकेची आई आजारी पडली होती. सुदैवानं ती मुलगी त्या दिवशी जिंकली व तिच्या आईची प्रकृती सुधारली. स्पर्धा म्हटली की इतर स्पर्धकांपेक्षा थोडं कमी, जास्त होणारच. "कामगिरी चांगली झाली नाही" हे परीक्षकांनी कितीही सौम्य शब्दांत सांगितलं, तरी त्या क्षणाला दुःख होणारच. स्पर्धेत यशाप्रमाणेच अपयशही पचवण्याची मानसिक तयारी स्पर्धकाची/स्पर्धकाच्या कुटुंबीयांची असते का? स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टीकोण आपण बदलायला हवा. मानसिकता बदलायला हवी. मागच्या विश्वचषक क्रिकेटमधून भारतीय संघ सुरवातीलाच बाद झाला तेव्हा किती क्रिकेटप्रेमी हा पराभव पचवू शकलेत? स्पर्धेकडॆ/खेळाकडे खिलाडू वृत्तीने आपण का बघू शकत नाही?

"रिऍलिटी शो"मध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या वयाचाही विचार व्हायला हवा. स्पर्धकांचं वय काय? त्यांच्याकडून अपेक्षा काय? अकराव्या इयत्तेतली मुलंमुली जेव्हा स्पर्धेत उतरतात, तेव्हा पौगंडावस्थेत त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक बदलांचा विचार केला जातो का? या वयात भावनिक प्रकटीकरणावर नियंत्रण नसतं, नैराश्य, चिडचिड, हळवेपणा अशा अनेक छटा त्यात असतात व सभोवतालच्या टेन्शन्समुळे मन थार्‍यावर नसतं. अशा अस्थिर अवस्थेत त्यांच्याकडून अपयश पचवण्याची अपेक्षा करणं अवाजवी तर ठरत नाहीये ना? या वयात स्पर्धेत भाग घेण्याची पात्रता असते का? या सर्व प्रश्नांवर अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

अशा या स्पर्धांमधून नेमकं काय साध्य होतं हा एक वेगळाच प्रश्न आहे. स्पर्धा काटेकोरपणे पार पडल्यावर त्यातला "सर्वोत्तम स्पर्धक" विजयी होतो. "सर्वोत्तम" व "चांगला" या शब्दांमध्ये आपण गल्लत करतोय का? चांगला कलाकार निर्माण होण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे लागतात, चालू ठेवावे लागतात, कलेचं ज्ञान देण्यास योग्य असलेल्या गुरूचं मार्गदर्शन आवश्यक असतं व योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते. आज शिकले आणि उद्या सादर केले इतकं सोपं नसतं ते. मुलांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं म्हणजे कलेची साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असा गैरसमज केव्हा दूर करणार आपण? या स्पर्धांमध्ये पोषाख, प्रकाश योजना व "सस्पेन्स" निर्माण करणारी यंत्रणा बंद करावी असं माझं स्पष्ट मत आहे. झी-मराठीवरील "सारेगमप"मध्येही या गोष्टी खूप खटकल्यात. चारचौघात उठून दिसण्याबद्दल आक्षेप नाही, पण स्पर्धा गाण्याची आहे की वेशभूषेची आहे हे आधी स्पष्ट असायला हवं. असो.

स्पर्धेतला विजय जर केवळ सूज्ञ परीक्षकांच्या प्रामाणिक परीक्षणातून मिळणार असेल तर निदान "सर्वोत्तम" ठरलेला हा स्पर्धक काही प्रमाणात तरी चांगला आहे किंवा थोड्या परिश्रमांनी भविष्यात चांगली प्रगती करू शकतो अशी आशा करता येईल. पण दुर्दैवानं तसं होत नाही. "कहानी में ट्विस्ट" येतो तो इथे. या स्पर्धांमध्ये स्पर्धकाचा कलेतला दर्जा ठरवण्यासाठी विशिष्ट पातळीनंतर "परीक्षक" हे पात्र टप्प्याटप्प्याने गौण होत जातं आणि त्याची जागा घेतो "एस्.एम्.एस्." सगळा शाईनिंग इंडिया त्या स्पर्धेत कलेतल्या आपल्या "शायनिंग" ज्ञानाचा प्रकाश टाकून साक्षात् सरस्वतीच्या डोळ्यांत काजवे चमकवतो.

मग प्रश्न पडतो, फक्त कलाकारच "एस.एम्.एस्."ने का निवडले जावेत? डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक इत्यादि लोकंही "एस.एम्.एस्."ने का निवडले जाऊ नयेत? "एस.एम्.एस्." करणारी जनता खरंच इतकी सुज्ञ असेल, तर लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकींमध्ये "एस.एम्.एस्."ने मतदान करण्याची तरतूद का करण्यात येऊ नये? त्यामुळे भारतीय जनतेचा बहुमोल वेळ वाचेलच, त्याप्रमाणे निवडणूकीतला व त्याआधीच्या प्रचारसभांमधला खर्चही वाचेल. लोकसुद्धा निवडून येणार्‍या नेत्याला पाच वर्षे सहन करायचंय याचा सारासार विचार करूनच "एस.एम्.एस्." करतील.

"रिऍलिटी शो"चं हे महाभारत कधी संपणार? देव जाणे! महाभारतात द्रौपदी वस्त्रहरण झालं, इथे कलोपासनेचं वस्त्रहरण होतंय. महाभारतातल्याप्रमाणे इथे कलेला पणात हरलेला "धर्मराज"ही आहे, वस्त्रहरण करणारा (करणारं?) दुःशासनही आहे, विवश झालेले गुरू व कुटुंबीयही आहेत. राजा तर आंधळाच आहे. कमतरता आहे ती द्रौपदीला वस्त्र पुरवणार्‍या व धर्मयुद्धात धर्माच्या बाजूचं सारथ्य करणार्‍या श्रीकृष्णाची.

Tuesday, June 10, 2008

नव्या पिढीबद्दल सदैव नाराजीचा सूर का?

महत्त्वाची सूचना:
जुन्या पिढीतले बुजुर्ग संगीतज्ञ (गायन, वादन, नृत्य यांच्याशी संबंधित सर्व कलाकार - अभिजात शास्त्रीय संगीतापासून चित्रपट गीत, लोकगीत, इत्यादि सर्व प्रकार त्यात येतात), चित्रकार, शास्त्रज्ञ, पत्रकार, व्यावसायिक, समाजसुधारक, इतर क्षेत्रांतले कर्तृत्ववान लोक तसेच सामान्य माणूस, या सर्वांबद्दल मला आदर आहे. त्यांच्या विचारांचा मी आदर करतो. एवढंच नव्हे, तर नव्या पिढीला त्यांनी उच्च आदर्श प्रदान केल्यामुळॆ त्यांचा ऋणी आहे. जुन्या पिढीबद्दल भाष्य करण्याइतकी माझी कुवत नाही व तसा माझा दावाही नाही. कुठल्याही क्षेत्रातलं प्रतिनिधित्व करण्याइतका कर्तृत्ववान मी नाहीये; पण नव्या पिढीतल्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करण्याइतका सामान्य निश्चितच आहे. म्हणून, एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून मी काही विचार इथे व्यक्त करणार आहे. त्यात कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. तरी, कळत-नकळत अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यामुळे सर्वप्रथम मी जुन्या पिढीतल्या सर्वांची क्षमा मागतो.

आज बर्‍याच दिवसांनी ई-सकाळला भेट दिली. "खेळ सातबाराचा" या भावी चित्रपटातलं कविवर्य ग्रेस यांनी लिहिलेलं व पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं गीत जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्याबद्दलची बातमी व व्हिडिओ क्लिप पाहिली. हे तीन दिग्गज एकत्र आल्यावर होणारा कलाविष्कार अप्रतीम होता हे सांगावं लागलं तरच नवल. खरोखर बातमीच्या शीर्षकाप्रमाणे "ग्रेसफुल शब्दांना ग्रेसफुल आवाज" - ग्रेसफुल संगीतही. व्हिडिओ क्लिपमध्ये रेकॉर्डिंग रूम मध्ये आशाताईंच्या गाण्याची जेमतेम पाऊण मिनिटाची झलक प्रसन्न करून गेली. त्यानंतर आशाताईंची पत्रकारांनी घेतलेली मुलाखत व नेहमीप्रमाणे अतिशय नम्रपणे आणि मोनमोकळेपणे आशाताई बोलल्या. त्यावेळी पूर्वीच्या रेकॉर्डिंगच्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सांगितली. आगामी काळात त्या स्पेन व पोर्तुगाल येथे वर्ल्ड म्युझिक फेस्टिवलमध्ये जाणार आहेत. वयाची सत्तरी ओलांडली तरी अजूनही त्या सतत व्यस्त असतात हे आमच्या पिढीला खरोखर शिकण्यासारखं आहे. मुलाखतीदरम्यान आशाताईं म्हणाल्यात, "खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी गाणी गात होतो, त्याला कॅब्रे म्हणायचे, आणि त्यावेळचे लोकं आम्हाला नावं ठेवायचे; मला विशेषतः फार नावं ठेवायचे. तर आत्ताची हिरॉइनची गाणी बघितल्यानंतर असं वाटतं की मी त्यावेळेला भजनं गात होते.... आताचे ड्रेस आणि आताच्या ऍक्शन इतक्या व्हलगर असतात, की मला वाटतं की फॉरेनचे लोकंपण इतक्या व्हलगर ऍक्शन घेतात की नाही, माहिती नाही; इतकं व्हलगर आपल्या फिल्ममध्ये आता यायला लागलंय."

चित्रीकरणामध्ये अश्लीलतेचं प्रमाण आता वाढलंय हे कटु सत्य आहे. परंतु नव्या कलाकृतींना असं सरसकटं नावं ठेवणं खटकलं; व यशाची सर्वोच्च शिखरं पार करूनही विनम्र असलेल्या व अगदी साध्या माणसाप्रमाणे नव्या पिढीशी आनंदाने समरस होणार्‍या, लीलया संवाद साधणार्‍या आशाताईंसारख्या दिग्गज गायिकेने असं जनरलाईझेशन करावं याचं दुःख झालं. आशाताईंच्या विचारांचा मी नितांत आदर करतो. त्यांनी रिऍलिटी शोजबद्दल केलेली वक्तव्ये पटतातही. तरी या सर्व परिस्थितीबद्द्ल नव्या पिढीला दोषी ठरवणं मला पटत नाही. आशाताईंची क्षमा मागून आता मी काही गोष्टी इथे मांडू इच्छितो.

खोलात निरीक्षण केल्यावर लक्ष्यात येतं की केवळ आशाताईंच्या किंवा इतर मान्यवर संगीतज्ञांच्या विधानांपुरता किंवा संगीतकलेपुरता हा विषय मर्यादित नाही. एकंदरीतच नव्या पिढीबद्दल हल्ली जुन्या पिढीने नाराजीचा सूरच काढावा ही भारताची संस्कृती होते की काय? असं वाटायला लागलं आहे.संगीताचा विषय निघालाय म्हणून आधी गेल्या दहा-बारा वर्षांतल्या संगीताचा आढावा घेऊ. रिमिक्सबद्द्ल नव्या पिढीला नावं ठेवली जातात. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय संगीताच्या इतिहासातला पहिला रिमिक्स "पर्सनल मेमरीज - राहुल ऍन्ड आय" हा होता व तो जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी काढला होता. त्याला आता तब्बल बारा वर्षे होऊन गेली. (चूक भूल द्यावी घ्यावी.) नव्या पिढीने रिमिक्स केल्यावर "जुन्याच गाण्यांना नव्याने चाली लावण्यात काय अर्थ आहे?" असा सवाल केला जातो. जुन्या पिढीला मी विचारू इच्छितो, की एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार्‍या सिव्हिल इंजिनिअरला नवीन इमारत बांधता येत नाही असं आपल्याला वाटतं का? रिमिक्सच्या गाण्यांची मंदिराशी बरोबरी करू इच्छित नाही. पण "पिया तू अब तो आजा", "परदे में रहने दो", "सैया दिल में आना रे" इत्यादि गाणी त्या त्या काळात लोकप्रिय असूनही साधारणपणे १५ वर्षांपूर्वी तितकीशी ऐकली जात नव्हती. रिमिक्स निघाल्यावर मूळ गाणीही लोकं नव्यानं ऐकू लागले हे तरी मान्य कराल ना?

"रिऍलिटी शो"बद्दल म्हणायचं तर, "सारेगमप" जेव्हा "सारेगम" होतं तेव्हा स्पर्धकांचा दर्जाही चांगला होता व तरीसुद्धा त्यात पार्श्वगायक/पार्श्वगायिका निवडणे हा मुद्दा कधी नव्हताच. पार्श्वगायनासाठी कलाकार निवडणारा "मेरी आवाज सुनो" हा पहिला रिऍलिटी शोसुद्धा रीमिक्सप्रमाणेच एका तपाएवढा जुना. तेव्हा सर्वसामान्यांपर्यंत मोबाईल फोन पोहोचले नसल्यामुळॆ केवळ जाणकारांच्या परीक्षणातून कलाकार निवडले जात होते. अशा स्पर्धांमध्ये विजयी होणे म्हणजे सर्वस्व नव्हे, तर ती केवळ एक सुरवात करण्याची संधी हे त्यांत विजयी झालेले स्पर्धकही जाणतात. रिऍलिटी शोचं बाजारीकरण झालं ते मोबाईल फोन सर्वसामान्यांना परवडायला लागला तेव्हापासून. एस.एम.एस.च्या जोरावर स्पर्धकांमधून महागायक/महागायिका निवडली जाणं ही बाब आमच्या पिढीलाही पटत नाही. पण त्याला एस.एम.एस करणार्‍यांबरोबरच त्यात सहभागी होणारे संगीतज्ञही जबाबदार नाहीत का? संगीतासारख्या अभिजात कलेचा असा बाजार होत असताना हे संगीतज्ञ स्वतः नामवंत कलाकार असूनसुद्धा कडाडून विरोध करण्याऐवजी स्वतःच प्रोत्साहन देतात याहून मोठं दुर्दैव कोणतं? ज्या पिढीसमोर असे आदर्श असतील तर त्या पिढीकडून चांगल्या कलाकृतींची अपेक्षा कशी करणार?

तरीसुद्धा, अनेक उत्तमोत्तम कलाकृती नवीन पिढीने रसिकांना दिल्या आहेत. हिंदी व मराठी चित्रपटांच्या विषयांमध्ये हल्ली पूर्वीच्या तुलनेत वैविध्य वाढलंय ही गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. हिंदीतले दिल चाहता है, ब्लॅक, कलियुग, आजा नच ले, तारे जमीं पर इत्यादि चित्रपट तसेच मराठीतले तू तिथं मी, सातच्या आत घरात, नितळ, उत्तरायण, आम्ही असू लाडके, डॊंबीवली फास्ट, सावली इत्यादि चित्रपट स्वतःचा वेगळेपणा सांगून जातात. संगीताबद्दल म्हणायचं तर आयुष्यावर बोलू काही, साद तुझी इत्यादि मराठी अल्बम किंवा हिंदीमधील फाल्गुनी पाठक, सोनू निगम, अदनान सामी यांचे अनेक अल्बम तसेच दिल है के मानता नही, कुछ कुछ होता है, हम आप के दिल में रहते है, हम दिल दे चुके सनम, रेफ़्युजी, कलियुग, दिल चाहता है, तेरे नाम, परिणीता, यहा, वो लम्हे, टॅक्सी नं ९२११, तारे जमीं पर असे कितीतरी चित्रपट आहेत ज्यांतली गाणी (काव्यही आणि संगीतही) सरस आहेत व अजिबात व्हल्गर नाहीत. त्यांचं प्रमाण इतर व्हल्गर गाण्यांच्या तुलनेत कमी आहे हे मान्य. पण आजच्या काळात हवासुद्धा पूर्वीइतकी शुद्ध नाही. जसं हवेत प्रदूषण आहे तसंच प्रत्येक क्षेत्रात आलंय. हे जे चित्र आहे, ते एका रात्रीत बदललेलं नाही.

जी गत कलाक्षेत्रांत तीच शिक्षणक्षेत्रामध्ये. पूर्वी मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरही उत्तम नोकरी मिळायची, आता ते शक्य आहे का? वाढलेली लोकसंख्या त्यामुळे वाढत आलेली स्पर्धा आणि शिक्षणाचा व्यापार (यात दोष नव्या पिढीचा की जुन्या पिढीचा?) या सर्व गोष्टी त्यास कारणीभूत आहेत. मी शाळेत असताना, "मी शेंगा खालल्या नाहीत म्हणून मी टरफलं उचलणार नाही" हे लोकमान्यांचे उद्गार "स्पष्टवक्तेपणा"च उदाहरण द्यायला वापरलं जायचं. खरोखर आज शिक्षकाला एखादा विद्यार्थी असं म्हणाला तर त्याला त्या विद्यार्थ्याचा स्पष्टवक्तेपणा म्हणतात की उर्मटपणा/उद्धटपणा? मग, स्वतःला न पचलेल्या गोष्टी नव्या पिढीने मात्र लीलया पचवाव्यात हा अट्टहास कशासाठी? "आमच्या काळात कमी रिसोर्सेस असूनही किती कामं करायचो! नव्या पिढीला मात्र कष्ट करायला नको" अशा स्वरूपाची वाक्य ऐकण्याचीही नव्या पिढीला आता सवय झालीये. पूर्वीच्या पिढीसमोर टार्गेट किती होतं, आजच्या पिढीसमोर किती आहे; याचा विचार व्हायला नको का? वाढत्या प्रदूषणात नवी पिढीला रोज मैलोंमैल वाहन चालवत जावं लागतं तरी सर्व कामांमध्ये अतिशय उत्साहाने ही पिढी सहभागी होते हे जुन्या पिढीला जाणवलं का? तरी त्याबद्द्ल कुणालाही कौतुक नाही, करण संपूर्ण पिढीच त्यातून जातेय. पूर्वीची स्पर्धा लाखोंमध्ये होती आताची अब्जांमध्ये आहे. या नव्या पिढीला जन्माला कुणी घातलं? तिच्यावर संस्कार कोणी केलेत? जुन्या पिढीनेच ना?

जुन्या पिढीतल्या लोकांबद्द्ल नव्या पिढीला नेहमीच आदर होता व आहे. जुन्या पिढीतल्या आदर्शांप्रमाणे वाटचाल करण्यासाठी व सृजनशीलता जपण्यासाठी नवी पिढी सदैव प्रयत्नशील आहे. म्हणून, नवीन पिढीच्या वतीनं माझं जुन्या पिढीला एक मागणं आहे. आमच्यावर प्रेम करा. आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्या चुका अवश्य दाखवा, पण त्याबरोबर त्या सुधारण्याचा मार्गही दाखवा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची व आशिर्वादाची नव्या पिढीला गरज आहे.

Tuesday, May 27, 2008

निसर्ग, मन, सुटीचा दिवस आणि आळस

निळ्याभोर नवलाईने पानोपान बहरली झाडे
घालित वाटेवर पायघड्या पडले कुसुमांचे सडे

अंगावर ग्रीष्मात ऊन पडता ही वसुंधरा तापे
लाल, धवल, पिवळ्या, गुलाबी रंगांनी परी नटली रोपे

मध्येच कधी येऊन जाई हळूच एक पावसाची सर
पुन्हा होई आकाश मोकळे पुन्हा पडे ऊन प्रखर

असेच रम्य वातावरण घेऊन आला एक सुटीचा दिवस
भटकंती वाटे करावी, पहावा निसर्ग, फिरावे सहज

क्षणैक होई विचार ऐसा परी मन देई प्रचंड आळस
"शांतपणे बैस घरातच" म्हणे, "कशाला तो उन्हाचा प्रवास?

निसर्ग तो का पळून जाई? होते की दर्शन प्रतिदिन!
गंध फुलांचा दरवळे तोच, काय आज त्यामध्ये नवीन?

नाही आज कामावर जाणे, निवांत मग घ्यावी झोप
रंगीबेरंगी फुलांची स्वप्नातच पहावी महिरप"

Wednesday, May 21, 2008

वीकांतातला बोनस

काही काही गोष्टी अपघातानेच आयुष्यात घडत असतात. नाही का? बर्‍याचदा आपण एखादं काम हाती घेतो किंवा एखादी वस्तू मिळवण्याच्या मागे लागतो तेव्हा आपण अपेक्षा करतो एक आणि होतं भलतंच. थोडक्यात सांगायचं तर आपले अंदाज चुकतात. चुकतात म्हणजे ते काम अजिबात होतच नाही किंवा ती वस्तू मिळतच नाही असंच मात्र नाही. एखादी वस्तू शोधता शोधता आपण कल्पनाही केली नसेल असं काही तरी आपल्याला सापडतं आणि ते अनपेक्षित असल्यामुळॆ "बोनस" मिळाल्यासारखं वाटतं. असंच काहीसं मध्यंतरी माझ्या दैनंदिन आयुष्यात झालं.

"अल्मंड बटर"बद्दल ऐकल्यापासून तो काय प्रकार आहे हे पाहण्याची इच्छा झाली होती. इथे घराजवळच्या दुकानांमध्ये बराच शोध घेतला. तिथे पीनट-बटर, अल्मंड-मिल्क इत्यादि प्रकार सापडलेत पण अल्मंड बटर सापडे ना. व्हिगन स्टोअरमध्ये अल्मंड बटर हमखास मिळेल असं वाटल्याने इंटरनेटवर व्हिगन स्टोअर्स शोधून काढलीत. त्यात लॉस एन्जेलिस् डाऊनटाऊनमधला एक पत्ता शोधत निघालो. ते दुकान सापडलं, पण अल्मंड-बटर काही मिळालं नाही. पण या भटकंतीमुळे अलिबाबाची गुहा सापडावी तसं झालं आणि डाऊनटाऊनमधलं ग्रँड सेंट्रल मार्केट सापडलं.

हे मार्केट १९१७ सालापासून म्हणजे तब्बल ९१ वर्षांपासून अस्तित्वात आहे, तेव्हा त्याला लॉस एन्जेलिसचा "सांस्कृतिक ठेवा" म्हटलं तर वावगं ठरू नये. मेट्रो रेड लाईन लोकलच्या पेर्शिंग स्क्वेअर स्टेशनपासून उत्तरेकडे अगदी पायी चालण्याच्या अंतरावर असलेल्या या बाजारात हिल स्ट्रीट व ब्रॉडवे या दोन्ही रस्त्यांवरून जाता येतं. या बाजाराचं वैशिष्ठ्य असं, की तो "शॉपिंग मॉल" नाही. भाज्या, फळांची दुकानं अगदी भारतातल्या मंडईची आठवण करून देतात. विविध प्रकारची धान्ये, मसाले, इत्यादींची स्वतंत्र दुकानं तिथे आहेत. तसंच बेसमेंटमध्ये गृहोपयोगी वस्तुभंडार आहे. एवढंच नव्हे, तर खाण्यापिण्याची सोयसुद्धा आहे. चायनीज, मंगोलियन, जपानी, मेक्सिकन, इत्यादि विविध प्रकारच्या पदार्थांचे स्वतंत्र स्टॉल्स जत्रेची आठवण करून देतात. ताज्या फळांचे रस (रासायनिक किंवा इतर कुठलीही प्रक्रिया न केलेले) उत्तम मिळतात.

मला सर्वात जास्त आनंद झाला तो या बाजारात मिळणार्‍या कोथिंबिरीमुळे. स्वयंपाकात कोथिंबीर वापरल्याचं जाणवेल असा मस्त स्वाद त्या कोथिंबिरीला असल्यामुळे घराजवळच्या दुकानांमधून कोथिंबिरीसारखं दिसणारं गवत आता अजिबात विकत घेत नाही. कोथिंबीरच नव्हे; सर्वच भाज्या अगदी ताज्या मिळतात. लहान आकारातले कांदे, बटाटे, लिंबू - सगळंकाही ताजं, प्रक्रिया विरहित व त्यामुळे स्वस्त आणि मस्त. खरंतर फार्मर्स मार्केटमध्येही अशा भाज्या मिळातात, पण तिथे अशी मजा नाही. तिखट, तमालपत्र, काळी मिरी इत्यादि मसाले; तसेच राजमा, वाटाणे, चणे, इत्यादि पदार्थही तिथे मिळतात. हे पदार्थ भारतीय दुकानांमध्येही मिळत असले, तरी ग्रँड सेंट्रल मार्केटमध्ये जाऊन ते पदार्थ विकत घेण्यात एक वेगळीच मजा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे क्रेडिट/डेबिट कार्ड चालत नाही. रोख रक्कमच स्वीकारली जाते.

प्रत्येक गावाचं एक वैशिष्ठ्य असतं. लोक लॉस् एन्जेलिस् मध्ये युनिव्हर्सल सिटी, गेटी विला किंवा अनेक लोकांनी भेट दिल्यामुळे प्रसिद्धीस आलेली इतर प्रेक्षणीय स्थळं पाहायला येतात. पण सांस्कृतिक ठेवा असलेला हा बाजार खरोखर पाहण्यासारखा आहे.

असो. तर, या बाजाराविषयी माहिती मिळाल्यापासून आठवडाभराची भाजी आणायच्या निमित्ताने त्या पुरातन वास्तूचं दर्शन घेणे हा माझा सध्याचा वीकांतातला मुख्य उद्योग बनलाय. एकंदरीत, वीकांतातला हा बोनस फारच उपयुक्त ठरलाय.


विशेष सूचना: "वीकांत" हा शब्द मी प्रथम सुमेधाकडून ऐकला व तो आवडल्यामुळॆ तत्परतेने वापरू लागलो. :)

Saturday, April 19, 2008

सीताबाई

सीताबाई कुंभरे म्हणजे पूर्वी आमच्या घरची मोलकरीण. पूर्वी, म्हणजे अगदी माझ्या जन्माच्याही आधीपासून, ती आमच्या घरी - खरं तर अनंत भुवनमधल्या सगळ्या बिर्‍हाडांमध्ये धुण्या-भांड्यांपासून दळण आणण्यापर्यंत सगळी कामं करायची. मी लहान असताना सीताबाईनी मला कडेवरही घेतलं असेल! असेल कशाला? घेतलं होतंच की! तसा फोटोही होता एक. महिन्याच्या पगाराबरोबर दुपारचं जेवण, चहा आणि काही अन्न उरलं असल्यास रात्रीचं जेवण तसंच अधुनमधुन कोणाकडून नऊवारी साडी-चोळी (जुनं किंवा नवं) हे तिचे अलाऊअन्सेस. लग्न-मुंजीच्या वेळी मात्र नेहमीच्या तुलनेत भारी कपडेलत्ते मिळत.

घरातला अविभाज्य सदस्य असलेल्या सीताबाईला एकेरी हाक मारण्यामध्ये मालक-नोकर संबंधापेक्षा आपुलकीच कारणीभूत होती. तशी ती वयानं खूपच मोठी होती. तिच्या जन्माबद्दल विचारल्यावर "कांग्रेस भरला होता तंवाचा जन्म" असं थाटात सांगायची. त्या काळच्या बहुतांश मोलकरीणींप्रमाणे तीही निरक्षर होती. सीताबाईला साक्षर करण्याचे प्रयत्न अजिबात झाले नाहीत असं नाही. दुपारच्या चहाच्या वेळी खडू घेऊन फरशीवर तिचं नांव लिहून तिच्याकडून गिरवून घेण्याचे अनेक प्रयत्न आमच्या आजीने अधुन-मधुन केलेत. पण काही उपयोग झाला नाही. एकही अक्षर कळत नसलं, तरी तिला तिचा पगार माहित होता. मी लहान असल्यामुळे तिच्या पगाराचा आणि माझा काडीमात्र संबंध नव्हता, पण कोणे एके काळी तो दरमहा रु. ७० होता हे नक्की. नीट लक्ष्यात नाही, पण कोणीतरी तिची परीक्षा घेण्यासाठी पगार किती म्हणून विचारलं असताना "वीस अधिक पन्नास" असं काहीसं ती बोलल्याचं आठवतंय. हे "वीस अधिक पन्नास" म्हणजे पैसा मोजण्याची सीताबाई स्पेशल पद्धत. सीताबाई निरक्षर असूनही हिचं काहीच कसं अडत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं.

पुसटसं आठवतंय. घरात लोखंडी पलंग आल्यापासून लाकडी खाट धूळ खात पडून होती. ती खाट सीताबाईला देण्यात आली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. काही दिवसांनी आजीने तिला विचारलं, "खाट वापरतेस की नाही?" त्यावर ती उत्तरली, "घरात खाट ठेवायले जागा कुटं हाय?" "मग कुठे ठेवलीस खाट?" - आजी. "जळणाला वापरली." - सीताबाई. खाटेचा हा उपयोग आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा असल्यामुळे आम्ही कपाळाला हात लावला.

सीताबाईचं लग्न झालं होतं पण नवरा वारला किंवा नवर्‍याने तिला टाकून दिलं असं काहीतरी होतं. त्यामुळे ती वडिलांबरोबरच राहत असे. तिची आई पूर्वी अनंत भुवनमध्ये कामाला होती, ती वारल्यावर सीताबाई येऊ लागली हे मला आजीकडून कळलं. एकदा सीताबाईचं तिच्या वस्तीतल्या कुणाशी तरी भांडण झालं - इति सीताबाई. नक्की काय झालं कुणास ठाऊक, पण तेव्हापासून तिला त्या व्यक्तीचे भास होत व ती मोठमोठ्यानं शिव्या देऊ लागली. सीताबाईच्या या शिव्यांमुळे अनेक बिर्‍हाडांकडील तिची नोकरी सुटली. तिच्या शिव्यांचा खरंतर आम्हालाही त्रास व्हायचा पण तिच्या पोटा-पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आजीने तिला कामावर राहू दिलं.

सीताबाईचे वडील वारले तो दिवस आठवतोय. ती संध्याकाळी रडत रडत ही बातमी द्यायला स्वत: आली होती. तेव्हा तिची अवस्था पाहून खूप अस्वस्थ वाटलं होतं. त्या दिवशी कुणाकडे तरी लग्नाच्या रिसेप्शनला जायचं होतं. रिसेप्शनमध्ये सतत सीताबाईचा शोकाकुल चेहरा आठवत होता. वडिलांच्या निधनानंतर ती भावाकडे राहू लागली. तिचा भाऊ रिक्षाचालक(सायकल रिक्षा) होता. दारू पिऊन पिऊन तोही संपला. नंतर भावजयेला तिची अडचण होऊ लागली. "जोवरी पैसा तोवरी बैसा" - दुसरं काय? त्यामुळे तिला पैसा कमवणं अनिवार्य होतं. दुसरीकडे तिच्या शिव्यांमुळे त्रस्त झालेल्या लोकांकडून तक्रारींचं प्रमाण वाढू लागलं. काहीतरी तोडगा काढणं प्राप्त होतं. सीताबाईसुद्धा दिवसेंदिवस थकत चालली होती. पण तिला कामावरून कसं काढणार? म्हणून मग पगार कमी न करता भांडी घासायला सीताबाई आणि कपडे धुवायला दुसरी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सीताबाईला झालेलं दुःख आजही आठवतं. अशा परिस्थितीत पैशावरून आरडाओरडा होतो. सीताबाईला मात्र "अविश्वास" दाखवल्याचं दुःख झालं होतं. शेवटी तिला कसंबसं पटवून दिलं, की तुला पगार मिळणारच आहे, पण तू थकत चालली आहेस म्हणून तुझ्या मदतीला दुसरी मोलकरीण आहे.

नागपूरहून पुण्याला आल्यापासून सीताबाईचा संपर्क कमी होत गेला. कालांतराने सीताबाईला सक्तीचं रिटायरमेंट देऊन तिच्या गरजेनुसार आर्थिक मदत होत असल्याचं कळलं. तसं अनंत भुवनमध्ये तिला दररोज कुणाकडे तरी अन्न मिळायचं, दळण आणून दिल्याचे थोडेथोडके पैसे मिळत, त्यामुळे तिचं येणं जाणं चालू होतं. एन्.सी.एल्.मध्ये पी.एच्.डी.ची फेलोशिप सुरू झाली त्यानंतर नागपूरला गेलो असताना सीताबाईसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यावी अशी इच्छा होती. पण काय द्यावं हा प्रश्न होता. शेवटी काहीतरी वस्तू देऊन पडून राहण्यापेक्षा तिच्यासाठी काही खायला आणावं असं वाटलं. तिला खाऊ घातल्याचं समाधान वेगळंच होतं. ते शब्दांत किंवा पैशात नाही मोजता येणार.

नंतर एक-दोन वर्षात सीताबाईच्या निधनाची बातमी पुण्याला असतानाच कळली. ती बातमी कळली तेव्हा "सुटली बिचारी" म्हणून निश्वास टाकला, पण दुसर्‍या क्षणी सर्व आठवणी डोळ्यासमोरुन गेल्या. कारण सीताबाई मोलकरीणीपेक्षाही घरातला सदस्य होती. नागपूरहून गावाला जाताना, तसंच, अनंत भुवनवसीयांना लिहिलेल्या पत्रांत नमस्कारांमध्ये एक नमस्कार सीताबाईलाही ठरलेला असायचा. १९८९ ते १९९५ या काळात अनंत भुवन मध्ये दरवर्षी जुन्या पिढीतला एक एक सदस्य कमी होत गेला. तेव्हा मृतव्यक्तीच्या घरच्यांइतकंच दुःख सीताबाईच्या अश्रूंमधून व्यक्त झालं होतं.

खरंच निरक्षरतेचा सुसंस्कृतपणाशी संबंध असतो का? नोकरीवरून काढल्यावर पगार बंद होण्याच्या विचारापेक्षा "कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवला" असा विचार करणारी सीताबाई प्रामाणिकपणातली विशालता किती लीलया सांगून जाते! इदं न मम म्हणत आलो तरी दान केलेल्या खाटेचा जळणासाठी झालेला वापर मान्य न करणारा सुसंस्कृत की उगाचच्या उगाच वस्तू साठवून न ठेवता वापरून संपवून मोकळं होणारी सीताबाई सुसंस्कृत?

हल्ली नागपूरच्या दौर्‍यात "तुम्ही कसे आहात?" आणि परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी "कवा येणार?" असं मनापासून विचारणार्‍या सीताबाईची उणीव नेहमीच भासते. अशा या कुटुंबातल्या दिवंगत सदस्याला विनम्र अभिवादन.



Tuesday, March 25, 2008

बर्‍याच दिसांनी

बर्‍याच दिसांनी तानपुर्‍यातुन
उमटला आज स्वयंभू गंधार
बर्‍याच दिसांनी प्रसन्न मनाने
आराधना केली साधावया सूर

बर्‍याच दिसांनी अनुभवले की
सकाळी पडले आज लख्ख ऊन
बर्‍याच दिसांनी थंडी ती विरली
आणि झाले वसंताचे आगमन

बर्‍याच दिसांनी आस्वाद घेऊन
यथेच्छ जेवलो सुग्रास भोजन
बर्‍याच दिसांनी आज लोचनांनी
घेतले जगाचे सौंदर्य टिपून

बर्‍याच दिसांनी होऊन बेभान
नाच नाचलो मी रंगात रंगून
बर्‍याच दिसांनी आनंदाचे डोही
नाहले होऊनी दंग आज मन

Friday, February 29, 2008

आयुष्य (१)

आयुष्य असतं सुगंधी पुष्प
बागेमध्ये फुलणारं
देवाला प्रिय होऊन
निर्माल्य बनणारं

आयुष्य असते चंद्रकोर
नयनांना मोहवणारी
पूर्ण बिंब होण्यासाठी
कलेकलेनं वाढणारी

खरंच असतं का आयुष्य
इतकं रेखीव आणि सुंदर?
की असतं ते एक तुटलेलं स्वप्न
दुःखदायक वरचेवर?

आयुष्य असेल कदाचित् समुद्रलाट
किनार्‍याला लागणारी
स्पर्श होताच मागे फिरून
अंतर्धान पावणारी

आयुष्य असावा गंधार
तानपुर्‍यातून बोलणारा
सुरेल तारा छेडल्यावर
स्वतःहून प्रगटणारा

होवो त्याची फुलवात
निरांजनात तेवणारी
स्वत: पूर्ण जळून
परिसर प्रकाशमान करणारी

Monday, February 11, 2008

अमोल

काळाच्या पडद्याआड जेव्हा निघून जाती सगेसोयरे,
आठवणींच्या मालिकेत त्यां शोधीतसे हे मन बावरे.

पुत्र कुणाचा, मित्र कुणाचा, बंधू, दीर कुणाचा तो;
सोडुन गेला एकाएकी, जैसा नभी तारा तुटतो.

तत्पर होता मदत कराया, नच ठाऊक त्याला थकणे;
आसपास झळकतसे त्याचे असणे, दिसणे, वावरणे.

दृष्ट लागली कुणाची तरी या लाखातील एकाला,
निर्घृणपणे कोणी केले काळ्या रात्री ठार त्याला.

जन्माला येणार्‍या जीवां अटळ मरण हे सत्य जरी,
अकाली का ते यावे, देण्या अंध:कार कुणाच्या दारी?

सग्यासोयर्‍यांमध्ये आता एक जागा सदैव रिक्त;
असणे त्याचे आता राहे त्याच्या आठवणींतच फक्त.




माझा मावसभाऊ, (स्व.) अमोल बुधवार, दि. ६ फेब्रुवारी २००८ रोजी अचानक आम्हा सर्वांना सोडून गेला. त्याच्या अस्तित्वात इतका उत्साह आणि जिवंतपणा होता, की तो आमच्यात नाही हे स्वीकारायला मन तयार होत नाहीये. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि मावशी, काका, आजी, अनंत, अक्षय, सौ. योगिनी वहिनी, चि. रुची व चि. अनन्या, तसेच अमोलच्या सर्व आप्तस्वकीयांना धीर देवो.

Tuesday, January 29, 2008

अभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी

तंबाखूसेवन व धूम्रपानास चित्रपट अभिनेत्यांबरोबर आता राजकीय नेत्यांनाही प्रतिबंध लागू होणार असल्याची बातमी वाचली. धूम्रपान करून आरोग्य गमावणार्‍या जनतेबद्दल आरोग्य मंत्रालयाला वाटणारा कळवळा(?) पाहून मन भरून आलं. नुकतंच, शाहरुख ख़ान आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये देऊ नयेत असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलं. चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये नसावीत असं खरंतर पूर्वीच सरकारनं आवाहन केलं होतं. चित्रपटात पाहिल्यामुळे ५२ टक्के तरुणवर्ग धूम्रपानास उद्युक्त होतो असा कुठलासा अहवाल सांगतो. असा प्रतिबंध घातल्याने धूम्रपान आटोक्यात येईल यावर ज्याचा विश्वास असेल.... देव त्याचं भलं करो.

दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. मी पुण्याहून बडोद्याला खाजगी कंपनीच्या बसने जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर एक गुजराथी मनुष्य होता. साधारणपणे माझ्याच वयाचा. नाशीकजवळ एका 'रेस्टोरंट अँड बार'पाशी जेवणासाठी बस थांबली. तेव्हा "डु यु टेक ड्रिंक्स?" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न! मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. "महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही! हे म्हणजे जणु हरिद्वारला राहून गंगास्नान न करणं....." इत्यादि चेहर्‍यावर भाव करून तो स्वत: मनसोक्तपणे आचमन करायला गेला.

कुणी काय खावं किंवा प्यावं, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मद्यपान/धूम्रपान/तंबाखूसेवन चांगले का वाईट यावरही मत मांडू इच्छित नाही. पण अशी सक्ती करून काही साध्य होणार आहे का?

साध्य होणार तर! कारण ज्या गोष्टीची मनाई आहे, ती करून पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे, जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो. मोलकरिणीचं काम खालच्या दर्जाचं मानणार. पण मला घरकामासाठी मोलकरीण हवी. वेश्या-व्यवसाय अधिकृत करायचा? छे! छे! .. पण मी वेश्येकडे जाणार. 'संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू'च्या जाहिराती देऊन दारुबंदी करणार(?) आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है! .....

Thursday, January 10, 2008

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन













बहुदा मज तो ठावे, ही वनराई ज्याची;
त्या तिथल्या खेड्यात असे झोपडी तयाची.
हिमवृष्टी होताना पाहत थांबियलेल्या
मला, न तो पाहील इथे वनराईपाशी.

"अघटित घडले?" करी विचार हा घोडा माझा
"नसे उचित जागाही येथे विश्रामाला.
गोठियलेले सरोवर तथा ही वनराई,
काळ्या रात्री काय प्रयोजन थांबायाला?"

हलकेच मान हालवून वाजवी तो घंटी
विचारी जणू "अनुचित घडली बात कोणती?"
त्या नादाविण असे चहुकडे शांत शांत; पण,
हिमकण वाजती, गर्जते हवा स्वैर वाहती

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन
परंतु वचने अनेक मज पाळणे अजून
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर



"स्टॉपिंग बाय वुड्स् ऑन अ स्नोई ईव्हिनिंग" ही रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची कविता अनेक वर्षांपूर्वी वाचली होती. आज सहजच इंटरनेटवर ती कविता पुन्हा वाचनात आली, आणि अनुवाद करण्याचा मोह झाला. यातील यमकाचा प्रकार ( १,१,२,१; २,२,३,२; ३,३,४,३; ४,४,४,४ ) मूळ कवितेप्रमाणे आहे. स्वैर अनुवादात एक-दोन ठिकाणी थोडे बदल करावे लागले. मूळ कवितेचं उत्कृष्ट रसग्रहण इंटरनेटवर वाचल्यावर जास्त चांगल्या रीतीने आकलन झालं व अनुवाद करताना त्याची फार मदत झाली. अर्थात, रॉबर्ट फ़्रॉस्ट यांचे विचार साकारण्यात यशस्वी झालो की नाही, ते मला माहित नाही.